नवी दिल्ली , 22 जून (हिं.स.)।भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतरचा डोवाल यांचा हा दुसरा चीन दौरा असेल. या दौऱ्याचा प्रमुख उद्देश दहशतवादावर कठोर संदेश देणे हा आहे. त्याचबरोबर भारत-चीन संबंध अधिक सुधारण्यासाठीही चर्चा होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अजित डोवाल यांचा हा चीन दौरा शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या तयारीचा एक भाग आहे. ही शिखर परिषद सप्टेंबरच्या सुरुवातीला चीनमध्ये होणार आहे. डोवाल या दौऱ्यात चीन आणि रशियातील त्यांच्या समकक्षांशी भेट घेणार आहेत. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या दौऱ्यात अजित डोवाल दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याचा संदेश देतील. तसेच दहशतवाद्यांना मिळणाऱ्या मदतीला रोखण्याबाबतही ते चर्चा करतील.
याशिवाय या दौऱ्यात भारत आणि चीन दरम्यान थांबवण्यात आलेल्या थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनने भारताशी थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने चीनला कडक संदेश दिला होता. हा संदेश सीमापार दहशतवाद आणि पाकिस्तानच्या भूमिकेबाबत होता.
इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या एससीओ बैठकीत सहभागी होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डोवाल एससीओ सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशीही भेट घेऊ शकतात. सर्वांच्या नजरा या गोष्टीकडे लागून आहेत की डोवाल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेणार का नाहीत. वांग यी हे चीनचे विशेष प्रतिनिधी देखील आहेत. ही भेट भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि चीनकडून पाकिस्तानला लष्करी पाठबळ दिल्या जात असलेल्या वातावरणात होणार आहे.