अहिल्यानगर दि. 25 जून (हिं.स.) :- न्यायाचे रक्षणाबरोबर निसर्गाचे रक्षण ही देखील सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. जिल्हा न्यायालयाच्या गार्डन कमिटीच्या वतीने वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला न्यायालयीन अधिकारी, विधिज्ञ आणि कर्मचारी वर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कृष्णा सोनवणे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, ॲड. राजेश कावरे, ॲड. समीर पटेल, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. जय भोसले, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंजू शेंडे म्हणाल्या की, आपण न्यायाचे रक्षण करतोच, पण यासोबतच निसर्गाचे रक्षण करणे ही देखील आपल्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग आहे. आजच्या घडीला वाढते तापमान, कमी होणारी पर्जन्यमान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने आहेत. त्यामुळे अशा उपक्रमांद्वारे हिरवाईने परिसर नटवून पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.लावलेल्या वृक्षाच्या देखभालीची जबाबदारी गार्डन कमिटीच्या वतीने स्विकारण्यात आलेली आहे. न्यायालयीन परिसर अधिक हरित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध मोहिम सुरु असल्याचे यावेळी कमिटीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.