मृतकांमध्ये महिला नक्षलवादी अरुणाचाही समावेश
हैदराबाद, 18 जून (हिं.स.) : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राव जिल्ह्यात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीपीआय माओवादी उदय अरुणा आणि अंजू असे 3 नक्षलवादी ठार झाले. ही चकमक मरेदुमिल्ली पोलिस स्टेशन परिसरात झाली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. पोलिस अधीक्षक अमित बर्दार यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.
यासंदर्भात आंध्रप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना मरेदुमिल्ली आणि रामपाचोडावरम दरम्यान किंटुकुरु गावाजवळ 16 नक्षलवादी दिसले. यावेळी दोन्ही बाजुंनी सुमारे 25 मिनीटे गोळीबार झाला. त्यानंतर घटनास्थळी 3 मृतदेह सापडले आणि त्यांची ओळख उदय, अरुणा आणि अंजू अशी करण्यात आली. उर्वरित 13 नक्षलवादी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान आज, बुधवारी झालेल्या चकमकीमुळे ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीला (एओबीएसझेडसी) मोठा धक्का बसला आहे.
एओबीएसझेडसीच्या केंद्रीय समितीचा सचिव गजरला रवी उर्फ उदय, पूर्व विभागाची सचिव रवी वेंका चैतन्य उर्फ अरूणा आणि अंजू असे 3 मोठे नक्षलवादी ठार झाले आहेत. यापैकी गजराला रवि उर्फ उद्य याच्यावर 40 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गजरला रवी छत्तीसगडमध्ये सक्रिय होता. त्यानं 10 फेब्रुवारी 2012 रोजी आपल्या साथीदारांसह बीएसएफ टीमवर हल्ला केला, ज्यामध्ये कमांडंटसह 3 सैनिक हुतात्मा झाले होते. गजराला रवी 2014 पासून सातत्याने फरार होता.
तर अरुणा ही आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीचा ‘डेप्युटी कमांडर’ अरुणा उर्फ चैतन्य वेंकट रवी याची पत्नी होती. चैतन्य वेंकट रवी याला जानेवारी 2025 मध्ये छत्तीसगड पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. रवी वेंका चैतन्य उर्फ अरुणा ही महिलांना नक्षल चळवळीत ओढण्याचे काम करायची. तिच्यावर 25 लाख रुपयांचे पक्षीस होते. या 2 जहाल नक्षलवाद्यांसोबतच अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मरेदुमिल्ली आणि रामपाचोडावरम भागातील किंटुकुरु गावाजवळ आणखी एक नक्षलवादी अंजू देखील ठार झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी तिन्ही नक्षलवाद्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. चकमकीच्या ठिकाणाहून 3 एके-47 बंदुकी देखील जप्त केल्या आहेत.