पुणे, 29 मे (हिं.स.)।
गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिंपळी परीसरात निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या चार दिवसांत गुरुवारी दुसरा पाहणी दाैरा करीत नुकसानीची माहिती घेतली.
बारामती शहर आणि परीसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पुरसदृश्य परीसथिती निर्माण झाली. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री पवार सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत बारामतीत पोहचले. पवार यांनी बारामती शहर तालुक्यासह इंदापुर तालुक्याचा पाहणी दाैरा करीत नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी दौरा केला. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकर्यासमवेत संवाद साधला.
यावेळी पवार यांनी पंचनामे उरकले का ? धान्य देण्यास सुरवात झाली आहे धान्य मिळाले का ? असा सवाल करीत शासनाच्या उपाययोजनाबाबत माहिती देत शेतकर्यांना आश्वस्त केले.
पवार म्हणाले, ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत.संपुर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे सगळ एका झटक्यात होणार नाही. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल. मी त्या कामाच्या मागे आहे. इथ जरी बारामतीला असलो तरी सारखं माझे दोन दोन तासाला फोन चालले आहेत. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. मी इथुनच सह्याा करुन त्यांना पाठवतोय, तुम्ही काळजी करु नका, झालेल्या नुकसानीसाठी शक्य ती मदत करणार असल्याचे यावेळी पवार म्हणाले.