नवी दिल्ली, 10 मे
(हिं.स.) : पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने केवळ पाकिस्तानातील काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले
होते. परंतु, पाकिस्तान सातत्याने शहरांना टार्गेट
करीत आहे. तसेच शुक्रवारी (9 मे रोजी) पाकिस्तानने भारतातील काही रुग्णालये आणि शाळांवर हल्ले केल्याची
माहिती भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग देखील उपस्थित होते.
याप्रसंगी कर्नल
सोफिया यांनी सांगितले की, पाकिस्तानने पंजाबमधील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी
सैन्य सीमावर्ती भागात त्यांचे सैन्य हलवत असल्याचे दिसून आले आहे. लष्करी तळांना
लक्ष्य करण्याव्यतिरिक्त, पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूरमधील वैद्यकीय सुविधांनाही लक्ष्य केले. पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे. त्यांनी भारताच्या
लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची
शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे.
भारताने त्यांचे अनेक हल्ले निष्प्रभ केले आहेत.
पाकिस्तानने 26 हून अधिक ठिकाणी
हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई
दलाच्या तळांवर भारताची उपकरणे आणि जवानांना फटता बसला आहे. पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य
करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. याचबरोबर पाकिस्तानने भारतातील
आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला. यासोबतच पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी आज, शनिवारी सकाळी श्रीनगरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला, याला भारतीय सशस्त्र दलांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी
रात्री आणि शनिवारी सकाळी पाकिस्तानने भारतीय सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अनेक ड्रोन
हल्ले केले. परंतु, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने परतावून
लावले.
यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान पसरवत असल्याचे स्पष्ट केले.
पाकिस्तानचे भारतीय पायाभूत सुविधांचे गंभीर नुकसान झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे
असल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी धार्मिक
स्थळावर क्षेपणास्त्र डागल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचेही यांनी खंडन केले आणि
हे दावे हास्यास्पद असल्याचे सांगितले. पाकिस्तानने आपले सैन्य पुढे सरकवायला सुरुवात केली आहे. यामुळे तणाव आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. भारताचे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष असून भारतीय सशस्त्र दल उच्च ऑपरेशनल तयारीत
आहेत आणि सर्व शत्रुत्वाच्या कृतींना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि योग्य प्रमाणात प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानने योग्य
प्रतिसाद दिला तर हा तणाव न वाढवण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येणार असल्याचे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले.