मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राज्यात राजकारण रंगलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर काढावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्यासंबंधी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना लिहलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं नामांतरास ठाम विरोध केल्यानंतर नामांतराचा मुद्दा अधिकच पेटला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना एक पत्र लिहलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही संभागृहात मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरुन केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.
* नामांतराच्या हालचाली सुरु
औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज असे नामांतर करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने अधिसूचना काढावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांना पाठवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवर आज औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. त्यामुळं ठाकरे सरकारकडून औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा आहेत.