अमरावती, 27 जून (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असताना काही तालुक्यांत मात्र जोरदार पाऊस बरसला तर काही तालुक्यांत दिवसभर रिपरिप पाऊस सुरू होता. शेतीयोग्य पाऊस असल्याने मात्र शेतकरी चांगलाच सुखावला. तर दुसरीकडे मोर्शी तालुक्यातील काटपुर- ममदापूर येथे गुरुवारला दुपारी दोन वाजतापासून सतत तीन तास आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपत्रात ठेवलेली शेतक ऱ्याची मोटरसायकल पुरामध्ये वाहून गेली. जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून मान्सूनने आगमन केले आहे.
जिल्ह्यात पावसाच्या प्रतिक्षेत आतापर्यंत ५० टक्केवर पेरण्या आटोपल्या आहेत तर ५० टक्के शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे. अशातच गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असताना असताना धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, चांदूर रेल्वे, वरूड या तालुक्यांत चांगलाच पाऊस बरसला तर अचलपूर, मोर्शी, वरुड, चिखलदरा, धारणी, दर्यापुर, अंजनगाव सुर्जी, अमरावती आणि भातकुली तालुक्यांत मात्र सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. वातावरणात थंडावा व सतत रिमझिम पाऊस सुरू असल्याने पिकांना पोषक वातावरण पाहावयास मिळाले. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. काही तालुक्यांत सकाळपासून तर काही तालुक्यांत दुपारपासून पावसाने सुरूवात केली. त्यामुळे आता पेरणीला गती येणार आहे. —————