दुबई, 11 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावानंतर १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रविराम लागु करण्यावर सहमती दर्शवली. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा नियमांचे उललंघन केलं.दरम्यान या संघर्षाचा परिणाम क्रिकेटवर देखील झाला आहे. पाकिस्तान सुपर लीग खेळत असलेल्या बांगलादेशच्या खेळाडूने या तणावादरम्यान पाकिस्तानात काय स्थिती होती,याचा भयावह अनुभव सांगितला आहे.
बांगलादेशचा फिरकी गोलंदाज रिशाद हुसैन पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत लाहोर कलन्दर्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याने दुबई गाठताच पाकिस्तानातील धक्कादायक परिस्थितीबाबत खुलासा केला आहे. परदेशी खेळाडू घाबरले होते. त्यांनी पाकिस्तान सोडून जाण्याचा प्रयत्न केला, असं रिशादने सांगितलं.तो म्हणाला, ‘सॅम बिलिंग्स, डॅरिल मिशेल, कुशल परेरा, डेव्हिड विसे,टॉम करन हे सर्व परदेशी खेळाडू खूप घाबरले होते. दुबई गाठताच मिशेल मला म्हणाला की, मी पुन्हा पाकिस्तानात कधीच जाणार नाही. ते सर्व खूपच घाबरले होते.’यासह परदेशी खेळाडू इतके घाबरले होते की टॉम करनला रडू कोसळलं.या कठीण काळात त्यांना सांत्वना देण्यासाठी काही लोकांची गरज होती. खेळाडूंनी दुबई गाठलं आणि तिथून मग ते आपल्या मायदेशी गेले, असं रिशाद हुसैनने सांगितलं.
तसेच तो पुढे म्हणाला, ‘तो (टॉम करन) विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याला समजलं की विमानतळ बंद करण्यात आलं आहे. त्यावेळी तो लहान मुलांसारखा रडू लागला. त्यावेळी तो म्हणाला की, त्याला सांभाळण्यासाठी २ किंवा ३ लोकांची गरज होती. ज्यावेळी आम्ही दुबईत पोहोचलो त्यावेळी आम्हाला समजलं आम्ही निघाल्यानंतर २० मिनिटांनी विमानतळावर मिसाईल हल्ला झाला. ही बातमी खूप भयानक आणि वाईट होती. दुबई गाठल्यानंतर आम्ही सुटकेचा निश्वास घेतला. मी कुटुंबीयांना सांगितलं की, माझी काळजी करू नका.’
भारत- पाकिस्तान यांच्यातील तणावाची परिस्थिती पाहता आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती पाहता, ही स्पर्धा पुन्हा सुरू होणं, कठीण आहे. तसेच परदेशी खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात येणं देखील खूप कठीण आहे. दुसरीकडे आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या स्पर्धेला सुरूवात होऊ शकते