अमरावती, 5 मे (हिं.स.)
अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यात शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते व औषधी विकली जातात, अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या अनुषंगाने येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते व औषधी विकली जाणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, तसेच कृषी निविष्ठा विक्री संचालकांनी यासाठी सहकार्य करावे. केवळ दक्षता समित्या नेमूण शांत बसू नये. आवश्यकता भासल्यास स्वतः तपासणी करून, कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासावी. शेतकऱ्यांची फसवणूक होऊन नाडल्या जाणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश आ. प्रवीण तायडे यांनी चांदूरबाजार तालुका खरीपपूर्व कृषी आढावा बैठकीत केले. यावेळी ते बैठकीचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. ही आढावा बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.सभेला तहसीलदार रामदास शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सहल सातपुते, अधिकारी उपविभागीय कृषी उज्ज्वल आगरकर, गटविकास अधिकारी नारायण आमझरे, पं.स. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र देशमुख उपस्थित होते.
यावेळी कृषी सहाय्यक सतीश निमकर यांनी फळबाग लागवड व माधव देशमुख यांनी वनराई बंधारे योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर यांनी केले. त्यांनी खरीप नियोजन व कृती विभागाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली. आढावा बैठकीचे संचालन जयश्री चव्हाण, तर आभार प्रदर्शन सुनील तेलखेडे यांनी केले. बैठकीला शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तथा भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतीच्या बांधावर जाऊन सुक्ष्म नियोजन करा
याप्रसंगी बोलताना आमदार म्हणाले, कृषी विभागाने शेतक-यांना त्यांच्या योजनांचा शंभर टक्के लाभ, तसेच योजनेचा पूर्ण मोबदला शेतकऱ्यांना द्यावा. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्याना कसा फायदेशीर खेल यासाठी बांधावर जावून खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश ही आ. प्रवीण तायडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याला दिलेत.