अमरावती, 20 जून (हिं.स.) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे भाविकांचा ओघ सुरू आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक विशेष योजना सुरू केली आहे. यामध्ये एका गावातून ५० किंवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्र येऊन बुकिंग केल्यास त्याच गावातून थेट पंढरपूरकडे विशेष बस सोडण्यात येणार आहे. ही सेवा जिल्ह्यातील कोणत्याही गावासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील भाविकांना आधी तालुक्याला किंवा जिल्हा मुख्यालयाला जाऊन बस पकडण्याची आवश्यकता राहणार नाही.
आषाढीनिमित्त काही भाविक अमरावती जिल्ह्यातील विविध गावांतून वारकरी पंढरपूरकडे जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मागणी केल्यास आषाढी एकादशीसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. मागील वर्षी एसटी महामंडळाकडून १५५ बसेस सोडण्यात आल्या होत्या. ज्या गावातून चाळीसपेक्षा जास्त भाविक एकत्र बुकिंग करतील त्यांच्यासाठी गावातून एसटी सोडली जाईल. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने सवलती सुरू केल्या आहेत. या सवलतींचा लाभ विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी करता येणार आहे.
गावात येणार बस
एकत्र तिकिटाचे बुकिंग असणाऱ्या गावातून थेट एसटी बस पाठविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यामुळे भाविकांना गावातूनच प्रवासाची सोय उपलब्ध होईल.
महिलांना तिकिटात सवलतएसटी महामंडळाकडून महिला प्रवाशांना तिकिटात पन्नास टक्के सवलत देण्यात येते. गावातून बुकिंग होणाऱ्या बसमध्ये देखील महिलांना तिकिटात सवलत असणार आहे.