अमरावती, 3 मे (हिं.स.)
जातनिहाय जनगणनेची केंद्र सरकाने घोषणा केल्यानंतर, या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाचे श्रेय, भाजप घेण्यास सुरुवात केली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने देखील रणनीती आखली आहे.
काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक दिल्लीत झाली असून, हा मुद्दा हातून निसटू नये, यासाठी जातगणनेच्या इतर संवेदनशील मुद्यांवरून केंद्राची कोंडी करण्याची तयारी केली आहे. केंद्राने जातनिहाय जनगणनेची घोषणा करताच, काँग्रेस देखील आक्रमक होत श्रेयवादाच्या लढाईत उतरली आहे. अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी जोरदार बॅनरबाजी करत भाजपला डिवचलं आहे.
केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणना होणार असल्यास जाहीर केलं. काँग्रेस (Congress) नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने लावून धरली होती. जातगणनेला कडाडून विरोध करणाऱ्या भाजपला अखेर नमते घ्यावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 16 एप्रिल 2025 मध्ये पत्र लिहून हिच मागणी करण्यात आली होती. त्यावेळी देखील जातगणनेला विरोध करण्यात आला. पण आता केंद्रातील मोदी सरकारने जातगणनेचा निर्णय झाला. या सर्वांचे श्रेय काँग्रेसने कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांना दिले. राहुल गांधी या मागणीवर आता केंद्र सरकार काम करत असल्याने त्याचे श्रेय घेण्याची तयारी संपूर्ण देशात काँग्रेसने सुरू केली आहे. भाजपकडून देखील या निर्णयाचे स्वागत होत आहे.
अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी संपूर्ण अमरावती शहरात जोरदार बॅनरबाजी केली, आता जातीय जनगणना होणार, असा उल्लेख यामध्ये करत, बहुजन की जीत है, राहुलजी का संघर्ष है, असे म्हणत भाजपला डिवचलं आहे. जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी, असा उल्लेख बॅनरबाजीत करण्यात आला आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देताना, राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आलं, त्यांनी सातत्याने जातीय जनगणनेची मागणी केली होती. त्यामुळे आता त्याची तातडीने अंबलबजावणी व्हावी, अशी मागणी केली.