नवी दिल्ली / अयोध्या : अयोध्येतील प्रभू राम मंदिराचं भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. या दिवशी २२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या वीटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच ‘जय श्रीराम’ असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे.
एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही आणलं जाणार आहे. तसंच पवित्र मातीही आणली जाणार आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोण हजेरी लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपतींच्या नावांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सोहळ्याला रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे. ५ ऑगस्टला मोदी सकाळी ११.३० वाजता अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राम जन्मभूमीच्या दिशेकडे रवाना होती.
मिळालेल्या माहितीनुसार , भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील. यामध्ये ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद आणि न्यासाशी संबंधित असणार आहेत. तसेच, देशातील ५० नेत्यांचाही समावेश असणार आहे.
* मुस्लिम भक्त 501 दिवे लावणार
राम मंदिराचे समर्थक अनीश खान (उर्फ बबलू) यांनी यापूर्वीच रामाच्या भव्य मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना घरीच राहून तूप दिवे जाळण्यासाठी आवाहन केले होते. त्यावर विश्वास ठेवून मुस्लिम बबलू खानने संपूर्ण कुटुंबासमवेत दिवे व वात गोळा करण्यास सुरवात केली आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामललाच्या मंदिराचे भूमिपूजन करतील, त्याचवेळी भगवान राम यांच्या पायाभरणीच्या स्मरणार्थ ते 501 दिवे लावतील. या रामभक्ताने संपूर्ण देशातील मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की, सर्व लोकांनी त्यांच्या घरी दिवे लावावेत आणि दिवाळी साजरी करावी.