रायपूर, 29 मार्च (हिं.स.) : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज, शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमक उडाली. या चकमकीत आतापर्यंत 16 नक्षलवादी ठार झाले. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी चकमकीला दुजोरा दिला आहे. दरम्यान अजूनही चकमक सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली. केरळपाल परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कर्मचारी सहभागी आहेत. यापूर्वी सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले होते की, सुकमा-दंतेवाडा सीमेवरील उपमपल्ली केरळपाल भागातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 15 नक्षलवादी ठार झाले.