मुंबई, 14 ऑगस्ट – वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील दोन पुनर्वसन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी इमारती व सदनिकांची पाहणी केली.
या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मिलिंद देवरा, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृहनिर्माण व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
भर पावसातही बीडीडी वसाहतीतील नागरिकांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले. मान्यवरांनी इमारतीच्या 40 व्या मजल्यावर जाऊन सदनिकांची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याधिकारी बोरीकर यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.