मुंबई : महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस येत्या ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर मांडण्यात येईल. तसेच येत्या १० मार्च रोजी अर्थसंकल्प अधिवेशनाची सांगता होईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत होते. सुधीर मुनगंटीवारांचे भाषण पाहताना नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला. राज्यपालांनी मराठीमध्ये भाषण केले ही मोठी गोष्ट आहे. तर तिसऱ्या दिवशी भाजपा नेते शेतकरी भरपाईच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.
* विदर्भ वेगळा होऊ देणार नाही
‘विदर्भ वेगळा होऊ देणार नाही. विदर्भ हे माझे आजोळ आहे. माझे आजोळ माझ्यापासून तोडू देणार नाही. विदर्भ तोडण्याचा प्रयत्न करू नका. विदर्भासह राज्याचा विकास करणार आहे’, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी विधानसभेत म्हटले. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे. त्यावर ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
* “हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही’
‘शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही. हिंदु म्हणून जन्मलो, हिंदू म्हणूनच मरणार. बाळासाहेब हिंदुत्वासाठी उभे राहिले तेव्हा कुठे होता? बाबरी मशीद पाडल्यावर बाळासाहेब एकटे उभे राहिले, येडेगाबाळे पळून गेले. फक्त राम मंदिर बांधून चालणार नाही. संघमुक्त भारतची घोषणा करणाऱ्या नितीश यांना भाजपने साथ दिली. काश्मिरी पंडितांच्या पाठिशी सेना उभी राहीली’, असे ठाकरे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* ‘केंद्राला प्रश्न केला की दहशतवादी म्हटले जाते’
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी विधानसभेत बोलताना महाराष्ट्रातील विरोधकांसह केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अनेकजण महाराष्ट्रात कोरोना काळात घोटाळा झाल्याचे आरोप करतात. पण, पीएम फंडाबाबत प्रश्न विचारण्याचे कोणाचेही धाडस होत नाही आणि जर कोणी प्रश्न विचारला तर…, देशातील परिस्थिती बिघडली आहे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरे सरकारमधील नेत्यांनी आवाज केला की …दहशतवादी….दहशतवादी …. दहशतवादी.
* ‘शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे’
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. गेल्या 98 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ठाकरे म्हणाले, की ‘शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे. नुसते भारत माती की जय म्हटले म्हणजे देशप्रेम सिध्द होत नाही. शेतकरी अतिरेकी आहेत का? देश तुमची खासगी मालमत्ता नाही आणि महाराष्ट्र तर नक्कीच नाही. तारांचे कुंपण देशाच्या सीमेवर असायला हवे. शेतकऱ्यांची काळजी पाहिजे’.
उद्धव ठाकरे विधानसभेत म्हणाले, संत नामदेव हे महाराष्ट्राचे महान संत आहेत. त्यांनी पंजाबमध्ये मोठं काम केले आहे. तेथील शेतकर्यांसाठीही काम केलं आहे, पण आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आला आहे, यावरदेखील विचार केला पाहिजे. देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांना येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्या मार्गांवर खिळे ठोकले जात आहेत. शेतकर्यांसाठी इतकी तयारी केली पण चीनकडे बघून पळ काढला.
* भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी केल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते आज विधानसभेत म्हणाले की, आता मला वाटते की भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. ठाकरे म्हणाले की, “वीर सावरकरांवर भाजप खूप प्रेम दाखवत आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारला दोन वेळा पत्र पाठविण्यात आले होते. तरीही सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावं.