नक्षलविरोधी मोहिमेतून तेलंगणाने घेतली माघार
मुंबई/गडचिरोली, 05 मे (हि.स.) : छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेतून तेलंगणा सरकारने अचानक माघार घेतली असून, त्यामुळे नक्षलवाद्यांना जंगलात पळून जाण्याची संधी मिळाली आहे. जनसंघर्ष समितीने या कारवाईवर टीका करत तेलंगणा काँग्रेस सरकारवर देशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे.
जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील करेगुट्टा येथील सुमारे 5 हजार फूट उंचीच्या डोंगरात 3 हजारांहून अधिक नक्षलवादी अडकले होते. त्यामध्ये खतरनाक नक्षलवादी – हिडमा, देवा, दामोदर, आझाद व सुजाता यांचा देखील समावेश होता. सीआरपीएफ, छत्तीसगड पोलिस आणि तेलंगणाचे जवान यांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. मात्र अचानक तेलंगणा पोलिसांनी माघार घेतल्यामुळे नक्षलवादी तेलंगणाच्या जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. शिर्के यांनी आरोप केला की, राजकीय दबावात काँग्रेसने देशाच्या सुरक्षेचा सौदा केला आहे. या मोठ्या कारवाईत काही जवान उष्माघाताने त्रस्त होऊन मागे हटले, तेव्हा या मोहिमेच्या तपशीलांची माहिती समोर आली. सध्या या मोहिमेत केवळ सीआरपीएफ व कोब्रा युनिट कार्यरत आहे, तर तेलंगणा पोलिस सहभागी नाहीत, असे स्पष्ट वक्तव्य तेलंगणाच्या भद्राद्री कोत्तागुडेम जिल्ह्याचे एएसपी विक्रांत सिंह यांनी दिल्याचे शिर्केंनी सांगितले.
बुद्धिजीवींचा दबाव, सरकार गोंधळात
शिर्के यांनी सांगितले की, नक्षलविरोधी मोहिमेच्या विरोधात 3 स्तरांवर कटकारस्थान रचले गेले. मोठ्या संख्येने नक्षलवादी संपवले जातील अशी शक्यता लक्षात घेत तथाकथित मानवाधिकार कार्यकर्ते व बुद्धिजीवी सक्रिय झाले. माजी न्यायमूर्ती चंद्रकुमार, प्राध्यापक हरगोपाल यांच्यासह काहीजणांनी २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना पत्र लिहून नक्षलवाद्यांशी संवाद साधण्याची विनंती केली. यामुळे तेलंगणा सरकार दबावाखाली आले, असा शिर्के यांचा आरोप आहे.
बीआरएसचा सूड..?
शिर्के यांनी भारत राष्ट्र समितीवरही गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील दारू घोटाळ्यात बीआरएस नेत्या के. कविता यांना अटक झाली होती. त्यांना वाचवण्यासाठी केसीआर यांनी खूप प्रयत्न केले, पण अयशस्वी ठरले. यानंतर केंद्र सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेत अडथळा आणण्यासाठी केसीआर यांनी नक्षलवाद्यांच्या शांतता प्रस्तावांना समर्थन दिले. बीआरएसनेही मुख्यमंत्री रेड्डी यांना पत्र लिहून शांतता चर्चेची मागणी केली. शिर्के यांनी म्हटले की, केवळ वैयक्तिक सूडासाठी बीआरएसने हा राजकीय डाव खेळला आहे. यापूर्वीच्या केसीआर यांच्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत तेलंगणात नक्षलवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यात आल्याचे शिर्के यांनी नमूद केले.
रेवंत रेड्डींनी स्वतःचे नाव खराब केले
शिर्के म्हणाले की, नक्षलवाद्यांनी काँग्रेसला सर्वाधिक नुकसान केले आहे. छत्तीसगडमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांचा बळी घेत काँग्रेसची मोठी हानी केली होती. अशा स्थितीत जर तेलंगणा सरकारने केंद्रासोबत मिळून कारवाई केली असती, तर तो सूड पूर्ण झाला असता आणि इतिहासात काँग्रेस व तेलंगणा यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले असते. पण नक्षलसमर्थक बुद्धिजीवी आणि केसीआर यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ऑपरेशनमधून माघार घेतल्याने त्यांनी स्वतःचे नाव खराब केल्याचे शिर्के यांनी सांगितले.
दरम्यान शिर्के यांनी मागणी केली की, केंद्र सरकारने छत्तीसगड, महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांतील नक्षलप्रभावित क्षेत्रे ताब्यात घेऊन कारवाई करावी. त्यामुळे या राज्यांना राजकारण करण्याचा वाव मिळणार नाही आणि नक्षल चळवळ संपवणे सोपे होईल. यासंदर्भात ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.