नाशिक, 23 जून (हिं.स.)।
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा आमचा मोठा भाऊ आहे असे आम्ही समजतो आणि कायम भाकपशी चर्चा करूनच भूमिका ठरवत असतो, अशी भावना शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी भाकपच्या 25 व्या राज्य अधिवेशनाला शुभेच्छा देताना व्यक्त केल्या.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 25 व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाकपच्या अधिवेशनात हजेरी लावून त्यांच्या पक्षाच्या वतीने भाकपच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या, डाव्या आघाडीची एकजूट हाच वर्तमान परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकमेव उत्तर आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मागे पडलो आहोत, आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष जिवंत राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या कष्टकऱ्यांच्या पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे, तरुणांना आपण सामील करून घेतले पाहिजे असे प्रतिपादन आमदार तथा शेकापचे नेते भाई जयंत पाटील यांनी केले.
भारताची विमानतळे इराण विरोधातील युद्धासाठी वापरण्याचा डाव आखला जात आहे, जन सुरक्षा विधेयकाचा मोठा धोका आहे, हिंदीची सक्ती करून सांस्कृतिक दहशतवाद आणला जात आहे, ही आव्हाने पेलण्यासाठी डावी व मानवतावादी आघाडी मजबूत करूया असे आवाहन करीत भाकपच्या 25 व्या राज्य अधिवेशनाला भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादीचे) राज्यसचिव डॉ. अजित नवले यांनी शुभेच्छा दिल्या. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले यांनी या अधिवेशनात शुभेच्छा देताना आपण विधानसभेत किती आहोत हे महत्त्वाचं नसून आपण रस्त्यावर किती माणसं उतरऊ शकतो या गोविंद पानसरे यांच्या वाक्याची आठवण करून देत डावी आघाडी मजबूत करण्याचे आवाहन केले.
—————