उल्हासनगर, 24 जून (हिं.स.)। आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे काम लोकांसमोर घेऊन जायची जबाबदारी आपली आहे. पंतप्रधान मोदी रात्र दिवस देशासाठी काम करताहेत. उल्हासनगर येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते घराघरात जाऊन पत्रकांद्वारे, सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान मोदींची प्रभावित करणारी भाषणे लोकांपर्यंत पोचवा. जी ११ वर्ष मोदींनी देशासाठी समर्पित केली ती आपणही समर्पित भावनांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत, असे आवाहन भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्धल उल्हासनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थानिक आमदार कुमार आयलानी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, विनोद गोवानी, प्रशांत पाटील, प्रदीप भालचंदानी, प्रकाश माकेजा यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले कि, ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी दिला. जो समाजाचा शेवटचा घटक आहे त्यासाठी काम करा हा पंडित दीनदयाल यांनी जो मंत्र आपल्याला दिला त्यानुसार पंतप्रधान मोदींनी ११ वर्ष गरिबांचे हित करण्यासाठी दिले. माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी गरिबी हटाव बोललेल्या. मात्र गरिबी हटली नाही. परंतु मोदींनी गरिबी हटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. डिजिटललायजेशनने जो भ्रष्टाचार होत होता त्याला आळा बसला आहे. डिबीटीच्या माध्यमातून व्यवहार सुरु आहेत. भ्रष्टाचार कमी करण्याची भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली.
ऑपरेशन सिंदूरचा आपल्या सर्वांना गर्व आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून मारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाले. मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. या युद्धात जी क्षेपणास्त्र वापरण्यात आली ती भारताने स्वतः निर्माण केली होती. एस-४०० प्रणाली तसेच ब्रम्होस, आकाश क्षेपणास्त्र, आयएनएस विक्रांत, तेजस आणि प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर सारख्या बनवलेल्या उत्पादनांनी भारत हा संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचे जगाला दाखवून दिले आहे. तसेच ज्याज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती अशा संकटात सापडलेल्या विदेशातील भारतीय नागरिकांना मोदी सरकारने सुखरुप मायदेशी आणले आहे. मोदी सरकार हे केवळ देशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध नसून जगभरातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे, हे यातून दिसल्याचेही दरेकर म्हणाले.
*नक्षलवादाचे प्रमाण ७०*
*टक्क्यांनी कमी झाले*
दरेकर म्हणाले कि, देशात नक्षलवाद फोफावला होता. तो कमी करण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेय. नक्षलवादाचे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला संकल्प आहे कि नक्षलवादाची ही कीड मुळासकट उखडून टाकायची. हे आपले ११ वर्षाचे सरकार आहे. कोविड काळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचे काम मोदी सरकारने केले. काँग्रेस काळात आपली अर्थव्यवस्था ११ व्या स्थानी होती आता ती चौथ्या क्रमांकावर आहे. मोदींनी सांगितलेय २०२७ मध्ये तिसरी अर्थव्यवस्था बनून भारताचे जगभरात नाव करणार.
*पंतप्रधान सर्वसामान्यांसाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील*
मध्यमवर्गीयांचे जीवन सुखकर बनविण्यासाठी मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले आहेत. यामुळेच १२.७५ लाखाचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला. २०२४ मध्ये चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली. आता भारत गगन यान मोहिमेच्या तयारीला लागला आहे. रस्ते, पूल, बोगदे, विमानतळ, हवाई मार्ग, रेल्वे, बंदरे यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी केली आहे. जगातील सर्वात मोठ्या उंचीच्या चिनाब नदीवरील पुलाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. गरीब कल्याण अन्न योजनेत ८१ कोटी लोकांना दरमहा ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ११ कोटीहून अधिक शेतक-यांना ३.७ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. आवास योजनेअंतर्गत ४ कोटींहूनही अधिक घरे बांधली गेली आहेत. १५ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी दिले जात आहे. १२ कोटीहून अधिक शौचालये बांधली गेली आहेत. शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातही उल्लेखनीय काम झाले आहे.
*विकास भी विरासत भी*
विकास भी विरासत भी या सूत्रानुसार मोदी सरकारने काशी विश्वनाथ कॉरीडॉर, महाकाल परीयोजना, राम मंदिर मंदिर निर्मिती केली आहे. डॉ.आंबेडकरांशी संबंधीत ५ ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास केला गेला आहे. नारीशक्ती अभियानाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर झाले त्यात महिला अधिकारी होत्या. मोदींना सांगायचे होते कि आमच्या संरक्षण दलात महिला आत्मविश्वासाने काम करताहेत.