सोलापूर : नागपूर येथील घटनेनंतर सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांचा सायबर सेल अलर्ट झाला असून व्हॉट्सअॅप, फेसबूक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर दररोज २४ तास लक्ष ठेवले जात आहे. दोन समाजात, धर्मात तेढ निर्माण होणारी पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावरील प्रतिबंधक कारवाईचा अधिकार आता सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून पोलिस उपायुक्तांकडे देण्यात आला आहे. एखाद्याने दुसऱ्याचे
ऐकून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास चाप्टर केसनुसार त्या व्यक्तीकडून सहा महिने ते एक वर्षाचा चांगल्या वर्तनाचा बॉण्ड लिहून घेतला जातो. याशिवाय सतत आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा सराईत असल्यास त्याच्याकडून दोन वर्षांचा बॉण्ड घेतला जातो. तरीदेखील बॉण्ड चे उल्लंघन केल्यास जेवढ्या रकमेचा बॉण्ड, तेवढी रक्कम वसूल केली जाते. तरीदेखील, वर्तन सुधारले नाही तर
गुन्हा नोंद करून गांभीर्य पाहून पुन्हा बॉण्ड घेतला जातो किंवा त्याच्यावर
तडीपारीची कारवाई देखील होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यावर विशेष लक्ष ठेवले जात असून त्यासाठी सोशल मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून 24 तास कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात आहे निगेटिव्ह पोस्ट टाकणाऱ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
विजय कबाडे,
पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर