अमरावती, 13 जून (हिं.स.)
बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्याच कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे अस मी मानत आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. असे वक्तव्य माजी मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी आज केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करत आहेत यावर प्रतिक्रीया देताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शेतकरी कर्जमाफी असूदे की, हमीभाव… मायबाप शेतकऱ्याच्या प्रत्येक मुद्यावर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यातही या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवलं आहे. आमचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी सातत्याने केंद्रीय पातळीवर कर्जमाफी आणि हमीभावाचा मुद्दा लावून धरला. किंबहुना आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना शेतकऱ्यांना दिलासा देत संपूर्ण कर्जमाफीचा निर्णयही आम्ही घेतला.
महाराष्ट्रात २०२४मध्ये २,६३५ तर मागच्या ६ महिन्यांत ८६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. डोक्यावरचं कर्ज, नापीकी, अवकाळी पाऊस तसेच सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना कंटाळून शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यात विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा अधिक आहे. राज्यातल्या महायुती सरकारने सत्तेत यायच्या आधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं. पण सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं अशी टिका त्यांनी यावेळी केली.
भाजप आणि महायुती सरकारचे घटक राहिलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सहा दिवस उलटतायत. त्यांची साधी दखलही या निगरगट्ट सरकारने घेऊ नये? आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बच्चू कडू यांनी मांडलेल्या मुद्यांना गांभीर्याने घ्यावं. तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली आहे.