अहिल्यानगर दि. 18 जून (हिं.स.) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार देशभरात १३ मे १५ ऑगस्ट दरम्यान साथी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत रस्त्यावरील निराधार बालकांनाही आता आधार कार्ड मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा साथी समितीची स्थापना करण्यात आली. हि समिती सर्व्हे करून विविध ठिकाणी आढळलेल्या १८ वर्षाखालील निराधार बालकांना आधार कार्ड काढून देणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात ज्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत, आशा निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख व इतर सेवा मिळणार आहे. हि मोहीम बालहित सर्वोपरी या तत्वार आधारित आहे. बालकांचे सर्वांगीण पुनर्वसन आणि विकास हे मुख्य उद्देश आहेत.ही मोहीम केवळ आधार कार्ड नोंदणी पुरती मर्यादित नसून यात मुलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व कायदेशीर हक्कांचे संरक्षण व त्यांच्या पुनवर्सनासाठी एकात्मिक दृष्टीकोन ठेवून काम करणार आहे.
*या बालकांचा समावेश आहे*
१८ वर्षाखालील मुळे ज्यांना कौटुंबिक आधार, पालकत्व किंवा निवारा, संरक्षण आणि आधाराचा श्रोत नाही, तसेच दुर्लक्षित रस्त्यावर राहणारी मुले, झोपडपट्ट्यामध्ये किंवा रेल्वेस्थानकावर राहणारी मुले, बालसंगोपन संस्थामध्ये राहणारी अनाथ मुले, बेघर मुले, बालकांच्या तस्करीतून सुटका झालेली बालके, निवारागृहे, किंवा नोंदणी नसलेली बालसंगोपन गृहे आणि कुटुंबाला परत मिळाली नाहीत, अशा सर्व मुलांचे २६ जूनपर्यंत सर्वेक्षण करून त्यांना २५ पर्यंत आधार नोंदणीद्वारे आधार कार्ड व नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हि समिती अहमदनगर जिल्ह्यातील निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देणार आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाचे सचिव कृष्णा एम. सोनवणे हे या समितीचे समन्वयक असून या समितीची बैठक घेण्यात आली. सर्व संबंधित अधिकार्यांना मार्गदर्शन करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.