खास प्रतिनिधी
सोलापूर : सोलापुरात मरण अक्षरश: स्वस्त झाले आहे. जणू आत्महत्येची लाटच येथे आली आहे. खास करुन बाब म्हणजे महाराष्ट्र हादरवून सोडणार्या प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकरांच्या अत्यंत धक्कादायक आणि खळबळ माजवून सोडणार्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर येथे जणू काही आत्महत्येचे ग्लॅमर वाढले आहे. 12 दिवसांत तब्बल आठजणांनी आत्महत्या करुन स्वत:ला संपवित या जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येपासून सुरु झालेलं येथील आत्महत्येचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही हे विशेष.
दरम्यान विविध कारणांमुळे आठजणांनी आपलं जीवन कायमचे संपविले असले, तरी त्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांमुळे सामाजिक चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. खास करुन बाब म्हणजे डॉ. शिरीष वळसंगकर आणि डॉ.आदित्य नमबियार या दोघांच्या आत्महत्येच्या घटनांनी अवघं वैद्यकीय क्षेत्र भूकंपाप्रमाणे हादरले. इतकंचं नाही तर या व्यावसायात भितीचं वातवरण निर्माण झालं आहे. डॉ.वळसंगकरांच्या पासून सुरु झालेलं हे आत्महत्येचं सत्र जसं थांबायचं नाव घेत नाही, त्याप्रमाणे या घटनांची चर्चासुद्धा थांबायला तयार नाही. या अप्रिय घटनांनी केवळ संबंधितांची कुंटूंबच नाही तर अवघं समाजमन चिंतातुर अवस्थेत राहात आहे.
सोलापुरातील आत्महत्येच्या सत्राबाबत येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निहार बुरुटे ( एमडी फिजिशीयन) यांच्याशी दैनिक ‘सुराज्य’ने संवाद साधला असता त्यांनी आत्महत्येच्या संदर्भात सांगितलेली काही कारणं…
– आई-वडिलांसह परिसरातील सदस्य यांच्यासोबतचा संवाद कमी झाला त्यामुळे दु:ख, नैराश्य कमी होण्यासंबंधी दिलासाच मिळेना
– जीवघेणी स्पर्धा वाढली, त्यातून ताणतणाव वाढलाय, अपेक्षित यश नाही मिळालं की येतं नैराश्य, नैराश्येच्या गर्तेतूनच आत्महत्येचा टोकाचं उचललं जातं पाऊल
– जुन्या काळात एखाद्या घटनेतून बदनामी झाली तर ती खूप लोकांपर्यंत जात नव्हती, आता सोशल मीडियातून बदनामी सर्वत्र पोचते, सोशल मीडियाच्या इंप्यक्टमुळे झालेल्या बदनामीमुळे जीवन नको वाटते
– मोबाईल, संगणक आदींच्या सतत संपर्कात राहण्यामुळे संवाद हरवालाय, मनातील गोष्ट मनातच राहात आहेत, त्या कोणापुढे सांगितल्या जात नाहीत, त्या मनातच घर करुन राहात आहेत, त्यातून अनर्थ घडताहेत
– मनाला आलेले नैराश्य, उदासपणा कमी होण्यासाठी उपाययोजना न करता त्या वाढतच जातात, नैराश्य अन् उदासपणातून घडताहेत आत्महत्या
: मोकळं बोलणं अत्यंत गरजेचे आहे, तेच होत नाही, आई-वडिल आणि मुलं यांच्यामध्ये संवादाची मोठी दरी पडत आहे, हेदेखील आत्महत्यांसाठी मोठे कारण आहे
: सर्वसाधारण आत्महत्येबद्दल अशी काही सर्वसाधारण कारणं असली तरी वैयक्तीक कारणंदेखील आहेत
: सोलापुरात मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्येच्या घडणार्या घटना हा दूर्देवी योग आहे, या घटनांना वेगवेगळी कारणं आहेत.
आत्महत्येसाठी ‘गळफास’ हाच ठरला पॅटर्न,
तब्बल सहाजणांची गळफासाने संपविले स्वत:ला
18 ते 29 एप्रिल या बारा दिवसांच्या काळात दोघा डॉक्टरांशिवाय इतर सहाजणांनी आत्महत्या केल्या त्या गळफास घेऊनच केल्या आहेत. आत्महत्या करण्यासंबंधी संबंधितांना गळफास हाच मार्ग सोपा वाटला असावा का हाच मुद्दा उपस्थित होतो. आत्महत्येसाठी गळफास हा जणू काही पॅटर्न ठरतोय, असंच चित्र घडलेल्या घटनांवरुन दिसतंय.
आयुष्य काय समजायच्या अगोदरच
12 वर्षाच्या कोवळ्या वयात ‘प्रियदर्शनी’ला जीवन ‘अप्रिय’
आयुष्य काय आहे, ते कसं जगायचं? याची अद्याप नीटपणे माहिती नव्हती. जगाची आणखीन पुरती ओळखदेखील झालेली नव्हती. तरीपण अत्यंत कोवळ्या वयात म्हणजे 12 व्या वर्षी प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे (रा. इंदिरानगर, सोलापूर) हिने गळफास लाऊन आत्महत्या केली.
आत्महत्येतून स्वप्न राहाताहेत अधुरी,
कुंटुंबियांच्या जीवाला लागला चुटका कायमच
अत्यंत कमी वयामध्ये, अविचारातून मुले आणि मुली आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलून स्वत:ला कायमचे संपवित आहेत. त्यांच्या या अविचारातून सुंदर जगणं तर बाजूला राहात आहे, पाहिलेली स्वप्ने अधुरीच राहात आहेत. शिवाय कुंटुंबियातील सदस्यांच्या जीवाला लागलेला चुटका कायम राहतोय. अकाली जाण्यानं कुंटुंबांचं नुकसान होत आहे.
12 दिवसांत‘यांनी’ ‘या’ कारणातून
जगाचा घेतला कायमचा निरोप
– प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर ( आत्महत्येचे गूढ अद्याप कायम)
– डॉ. अमित नमबियार ( नशेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज)
– 12 वीची विद्यार्थिनी स्नेहा गायकवाड ( जीवनाचा कंटाळा आला)
-11 वीची विद्यार्थिनी पूनम राठोड ( कारण अद्याप अस्पष्ट)
– अविवाहित तरुण सागर गोपीरेड्डी ( कारण गुलदस्त्यातच)
– प्रौंढ व्यक्ती: शंकर आडगळे ( आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट)
– अन्य दोन
24 तासांत तब्बल तीन आत्महत्या;
विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येची आठवण
सोलापूर शहर-जिल्ह्यात 28 एप्रिल दरम्यान 24 तासात तब्बल तीन जणांनी आत्महत्या करुन स्वत:ला कायमचे संपविले. 24 तास अन् 3 आत्महत्या हे समाजामधील भयानकच भिषण वास्तव आहे. विदर्भ-मराठवाड्यामध्ये शेतकर्यांच्या आत्महत्येचं सत्र जसं कायम राहतं. 24, 48 तासांमधील शेतकरी आत्महत्येच्या संख्येचे आकडे मोठे असतात. त्याचीच आठवण 28 एप्रिल दरम्यान आली. आत्महत्याचांच दिवस उजडल्याचा प्रकरण जणू काही झाला.