नवी दिल्ली , 19 मे (हिं.स.)।’ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे युरोपच्या सहा दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होत आहेत. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी या तीन देशांच्या नेत्यांशी ते राजनैतिक, सामरिक आणि आर्थिक सहकार्याबाबत चर्चा करणार असून, विशेषत: पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे मांडला जाण्याची शक्यता आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी (दि.१८) अधिकृत माहिती देताना सांगितले की, जयशंकर यांचा हा दौरा १९ ते २४ मे दरम्यान पार पडणार आहे. हे दौरे केवळ द्विपक्षीय संबंधच मजबूत करतील असे नाही, तर भारताच्या जागतिक धोरणात्मक उपस्थितीलाही नवे परिमाण देणार आहेत.जयशंकर यांचा जर्मनीचा दौरा जर्मनीच्या नव्या चांसलर फ्रेडरिक मर्झ यांच्या नियुक्तीनंतर होत आहे. जयशंकर यांची ही भेट दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान, व्यापार, नवोन्मेष, हरित ऊर्जा आणि जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर निर्णायक ठरणार आहे.
पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर १० मे रोजी दोन्ही देशांनी संघर्षविराम स्वीकारला. या कारवाईमागील पार्श्वभूमी, उद्देश आणि यशस्वी अंमलबजावणीची माहिती जयशंकर हे युरोपमधील आपल्या समकक्षांना देणार आहेत. या माध्यमातून भारत जागतिक व्यासपीठावर दहशतवादविरोधी आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे मांडण्याच्या तयारीत आहे.पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी भारताविरुद्ध झालेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला होता. त्यांनी दहशतवादाविरोधातील लढ्यात भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी या तिन्ही देशांनी भारतातील हिंसाचाराविषयी सहानुभूती व्यक्त केली असून, या दौऱ्याच्या माध्यमातून त्या भावनांना राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याच्या स्तरावर अधिक स्पष्ट आकार दिला जाणार आहे.