अमरावती, 15 जून (हिं.स.)
दिवसभर काळ्या मातीत राबराब राबणे, हे बळीराजाच्या आयुष्यालाच लागले आहे. जगाचा पोशिंदा कुटुंबासह शेतात कायम घाम गाळीत आला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बरसलेल्या पावसाने बळीराजा नव्या उमेदीने कामाला लागला आहे. लाखनी तालुक्यातील किटाडी येथील कोरडवाहू शेतशिवारात खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
निसर्गही साथ देत नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती झेलत निसर्गाच्या आशेवर वार्षिक अंदाज बांधत नियोजन करणारा बळीराजा यंदा तरी शेतातून भरघोस उत्पन्न पदरी पडेल या आशेवर खरिपातील पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याच्या घाईत दिसत आहे. वाढत्या महागाईचे चटके सहन करीत ऊन-पावसाची पर्वा न करता बळीराजा आपल्या कारभारणीसह शेतात कामे करीत आहे. निसर्गाच्या भरवशावर लाखो रुपयांचा सट्टा खेळणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने साथ दिली, तर आपले दारिद्रय दूर होईल, अशी अपेक्षा आहे. शेतीकामांना सुरुवात झाल्याने शेतमजुरांना रोजगार मिळू लागला आहे. शेतशिवार शेतकरी व मजुरांनी फुललेले दिसत आहे. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहे.
कृषी सेवा केंद्रावरही गर्दी
मृग नक्षत्राची सुरुवातच पावसाने झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे. चांगल्या प्रतीच्या बियाणांना अधिक मागणी आहे.
शेतात ही कामे सुरू
उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतात शेणखत टाकणे, केरकचरा पेटविणे, पाळे-धुरे कचरामुक्त करून नीटनेटके करणे, धुऱ्यांवरील तूर पिकांची जुनी मुळे उपटणे, धुन्ऱ्यांवर माती टाकून त्यात तीळ व तूर लावणे, यासह शेत नांगरणे, वखरणे पन्हे टाकण्यासाठी जागा तयार करणे, शेतातून जनावरांचे वैरण घरी आणणे या कामांची लगबग सुरू आहे.
आधुनिक शेतीला प्राधान्य
अलीकडे शेतीकामासाठी आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर अधिकाधिक होत असल्याने बैलजोडीचे महत्त्व हळूहळू कमी होत आहे. यामुळे साहजिकच पारंपारिक लाकडी शेती अवजारे दिसेनाशी होत आहेत. परिणामी, बैलजोडीच्या धुंगूरमाळांचा आवाज लयास गेला आहे.