सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार सुधारण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. दहावी व बारावीची परीक्षा असल्याने या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परीक्षा संपल्याबरोबर मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याबरोबर बैठक घेतली. माध्यमिक शिक्षण विभाग विरुद्ध असलेल्या तक्रारींचे तातडीने निराकारण करून कारभार सुधारण्याविषयी त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी जगताप आठवड्यातून कार्यालयात बराच वेळा नसतात अशा जास्त तक्रारी आहेत.
या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जगताप यांनी जास्तीत जास्त वेळ कार्यालयात द्यावा असेही सूचित करण्यात आल्याचे सीईओ जंगम यांनी स्पष्ट केले माध्यमिकचा कारभार सुधारण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमिकला कर्मचारी कमी असल्याबाबत सीईओचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर सीईओ जंगम यांनी नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाला मोठ्या संख्येने कर्मचारी मिळाले आहेत. यातील कर्मचारी माध्यमिक शिक्षण विभागाकडे मागणीनुसार देण्यात येतील. तसेच माध्यमिककडे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार असेल तर त्याचाही विचार करून या विभागाचा कारभार सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा विचार केला जाईल,
असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांची उकल होईल अशी रचना करणे, टप्पा अनुदानातील माध्यमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीच्या त्रुटी पूर्ततेसाठी आवश्यकतेनुसार कॅम्प घेणे, कोर्टसंबंधी प्रकरणे तातडीने निकालीत काढणे, मुख्याध्यापक पदोन्नती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, भविष्य निर्वाह निधीची कामे व वैद्यकीय बिलांची पूर्तता अशा प्रकरणांचे वेगाने निफ्टरा करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. या उपर ही कारभारात सुधारणा न झाल्यास शिक्षण आयुक्तांकडे पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.