नवी दिल्ली , 19 जून (हिं.स.)।इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथे राहणाऱ्या हजारो भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे.त्यानुसार, इराणमधून आणण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी गुरुवारी(दि.१९) सकाळी भारतात पोहोचली. पहिल्या तुकडीत ११० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे एक विशेष विमान दिल्ली विमानतळावर उतरले. दरम्यान, ४,००० हून अधिक भारतीय नागरिक इराणमध्ये राहत आहेत आणि त्यापैकी निम्मे विद्यार्थी आहेत. उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आर्मेनियाला आणण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सरकारच्या या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावास मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांना आर्मेनियाची राजधानी येरेवनमध्ये बाहेर काढण्यास मदत करत आहे. इराणमधील भारतीय नागरिकांना तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन हेल्पलाइन आणि नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या २४x७ नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
इराण आणि इस्रायलमधील चालू घडामोडी लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयात २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाशी या क्रमांकांवर संपर्क साधता येईल – १८००११८७९७ (टोल-फ्री) +९१-११-२३०१२११३ +९१-११-२३०१४१०४ +९१-११-२३०१७९०५ +९१-९९६८२९१९८८ (व्हॉट्सअॅप). याशिवाय, situationroom@mea.gov.in या ईमेल आयडीवर देखील संपर्क साधता येतो.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने २४x७ आपत्कालीन हेल्पलाइन स्थापन केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आणि संपर्क तपशील शेअर केले. त्यात म्हटले आहे की, फक्त कॉलसाठी: +९८ ९१२८१०९११५, +९८ ९१२८१०९१०९; व्हाट्सअॅपसाठी: +९८ ९०१०४४५५७, +९८ ९०१५९९३३२०, +९१ ८०८६८७१७०९; बंदर अब्बास: +९८ ९१७७६९९०३६; झाहेदान: +९८ ९३९६३५६६४९ आणि cons.tehran@mea.gov.in वर ईमेल करावा, असे आवाहन केले आहे. इराणमधून आणण्यात आलेल्या लोकांमध्ये यासिर गफ्फार नावाच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही रात्रीच्या वेळी क्षेपणास्त्रे उडताना पाहिली आणि मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. भीतीचे वातावरण होते, पण आता भारतात पोहोचल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला आहे.
एका विद्यार्थ्याने सांगितले की, इराणमधील परिस्थिती दररोज बिकट होत चालली आहे, विशेषतः तेहरानमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. सर्व भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढले जात आहे. भारतीय अधिकारी चांगले काम करत आहेत. आम्हाला सर्वांना सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे.प्रथम विद्यापीठातून आर्मेनियाला नेण्यात आले, त्यानंतर तेथून त्याला कतारला पाठवण्यात आले. शेवटी तो भारतात पोहोचला.