कागल, 20 जून (हिं.स.)। शासनाच्या पगारावर माझी रोजी – रोटी चालते, माझा संसार चालतो, माझ्या मुलाबाळांचे शिक्षण चालते. हा पगार देण्यासाठी जनतेतूनच पैसा गोळा होतो. याची जाण ठेवून शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता जर गोरगरिबाचं काम केलं तर मला वाटते या राज्यामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. योग्यवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती शासन करणार आहे. तसेच; लाडकी बहीण योजनेचे अनुदान २१०० रुपये करणार आहोत, असेही ते म्हणाले.
तहसीलदार कार्यालयाच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे अध्यक्षस्थानी होते.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शासकीय जी कामे आहेत, तसेच शासनाने वेळोवेळी काढलेल्या योजनांचा लाभ विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांकडून सुलभरीत्या मिळावा. यासाठी ही योजना महायुती सरकारने आणली आहे. यातून जनतेचे समाधान व्हावे, गोरगरिबांची परवड होता कामा नये, ही अपेक्षा शासनाची आहे.
ते म्हणाले, शासनाने पावसामुळे गोरगरिबांना तीन महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे . हे धान्य गोरगरिबांना मिळाले पाहिजे . पण तसे होताना दिसत नाही . त्यामुळे खरोखर जे गरीब आहेत त्यांना हे सवलतीचे धान्य कसे मिळेल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे . पेरणीचे दिवस आले की पाणंद रस्त्याच्या तक्रारी वाढतात .सरकारी मोजणीमध्ये चुका होत आहेत . याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे . या तक्रारी संबंधित विभागाने ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करून द्याव्यात . रस्त्यांच्या साईड पट्ट्यांवर हत्ती गवत लावतात हे चुकीचे आहे . ३३ फुटाचा रस्ता चांगला होतो . मात्र या हत्ती गवतामुळे रस्ता अरुंद बनतो . त्यामुळे रस्त्याच्या साईट पट्टीवर हत्ती गवत घेणे बंद करावे .