मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.)।
भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार करू न शकणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांना दृष्टिलाभ करून देण्यासाठी आधुनिक नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात वेळोवेळी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करावी तसेच नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
वडाळा मुंबई येथील अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २९) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ज्योत नेत्र रुग्णालय हे ३५ वर्षे जुने नेत्र रुग्णालय आता विविध देशांमध्ये नेत्र रुग्णालयांचे जाळे असलेल्या अगरवाल नेत्र रुग्णालय साखळीचा भाग झाले आहे.
आदिवासी भागांचे संविधानिक पालक या नात्याने आपण राज्यातील आदिवासी भागांमधील लोकांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहोत. या दृष्टीने नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण तसेच आदिवासी बहुल भागात नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करण्यासाठी मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. अगरवाल नेत्र रुग्णालयाने गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी फिरते नेत्र रुग्णालय सुरु केल्यास ती भारतमातेची चांगली सेवा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.
आपण झारखंड येथे राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला अनेक लोकांकडून नेत्रदानाची प्रतिज्ञा करवून घेतली होती तसेच आपण आपल्या कुटुंबीयांसह नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता असे सांगून यंदा पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करवणार आहोत, या दृष्टीने अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी संकल्प करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
सुरुवातीला राज्यपालांनी आधुनिकीकृत आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. एस. नटराजन यांनी राज्यपालांच्या दृष्टीची तपासणी केली.
उदघाटन सत्राला अगरवाल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अगरवाल, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या मुख्य नियोजन अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.