मुंबई, 16 ऑगस्ट – “ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार प्रत्यक्षात उतरवत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि शौर्याची जगासमोर प्रचीती दिली. आजच्या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर कार्य केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबई शहर व उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर झालेल्या उत्सवात त्यांनी उपस्थित सैन्य दलातील जवानांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर आणि आ. राम कदम उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, “दहीहंडी उत्सवातील गोविंदा पथकांनी उभारलेले थर सैन्य दलाच्या शौर्यासाठी अर्पण केले आहेत, ही प्रेरणादायी बाब आहे. सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घाटकोपर येथील उत्सवाने उल्लेखनीय कार्य केले आहे.”
यावेळी माजी सैन्य अधिकारी आनंद तिवारी यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सामाजिक कार्याबद्दल चेतन शाह आणि राजेश भीमसरे यांचा गौरव करण्यात आला.
विक्रोळीतील टागोर नगरातील आरंभ दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित राहून मुख्यमंत्री म्हणाले, “दहीहंडीतील एकावर एक थर समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे. सर्वांनी एकसंघ राहून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे हा त्याचा संदेश आहे.” या कार्यक्रमाला श्रुती विनोद घोगळे आणि सुहास माटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.