रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी शहरात होणाऱ्या टाटा संचालित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन येथील चंपक मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.
उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत, अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. श्री. पवार यांनी सर्वप्रथम तिथीनुसार आज होणाऱ्या शिवजयंतीच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, टाटा संचालित कौशल्य वर्धन केंद्राच्या उभारणीचा खर्च १९६.२८ कोटी असून त्यापैकी १६५.१० कोटी टाटा टेक्नॉलॉजी लि. यांच्याकडून उपलब्ध होणार आहेत. उर्वरित ३१.११ कोटी एमआयडीसीकडून दिले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी एमआयडीसीमार्फत १ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरवर्षी या प्रकल्पामधून ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रत्नागिरी काळानुरूप बदलत चालली आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, लवकरच विमानतळाची सोय होणार आहे. टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक वातावरण कौशल्य प्रशिक्षण देणे सोयीचे होणार आहे. रत्नागिरी आणि जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या केंद्राचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला आधुनिक पद्धतीने अद्ययावत केले जाणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीच्या नेतृत्वाखाली इतर उद्योग संघ आणि एमआयडीसी यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग, व्यावसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधन आणि उद्योजकता निर्माण करणे सोपे जाणार आहे.
चंद्रपूर, गडचिरोलीनंतर रत्नागिरीत हे केंद्र सुरू होत आहे, असे सांगून ते म्हणाले पुण्यात बाणेर, कल्याण-डोंबिवली, शिर्डी येथेही हे केंद्र सुरू होणार आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक या ठिकाणीही कौशल्य केंद्र दिले जाईल. कुशल मनुष्यबळ उभारायची गरज असून त्यामध्ये हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. कोस्टल रोड रेवस रेडी महामार्गाला प्राधान्य दिले जाईल. पायाभूत सुविधा अतिशय उत्तमरीत्या होतील, याला सर्वोच्च प्राधान्य राहील असे ते म्हणाले.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना रत्नागिरीतच शिकून रत्नागिरीतच नोकरी मिळावी, यासाठी २० हजार रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प रत्नागिरीत होत आहेत. वर्षभरात हे कौशल्य वर्धन केंद्र पूर्णत्वास येईल. नोकरीसाठी, रोजगारासाठी परदेशात जाण्याची आवश्यकता नाही. स्किलवर्धन केंद्राच्या प्रशिक्षणानंतर जिल्ह्यामध्येच ती पूर्ण होईल. त्यासाठी निधी देण्याचे काम दादांनी केले आहे.