इस्लामाबाद , 6 जून (हिं.स.)।कुख्यात दहशतवादी हाफीज सईद सध्या पाकिस्तान सरकारच्या सुरक्षेत असल्याचा दावा हाफीज सईदचा मुलगा तल्हा सईदने केला आहे. हाफीज सईज आरामात जगतायेत, पाकिस्तान सरकार कधीही त्यांना भारताला सोपवण्याचा विचारही करणार नाही असा पूर्ण विश्वास आहे.असे विधान तल्हा सईदने एका मुलाखतीत केले आहे.
तल्हा सईदच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तल्हाला विचारण्यात आलं की, पाकिस्तान सरकार भारताची कित्येक वर्षांची मागणी पूर्ण करत हाफीज सईदला त्यांना सोपवू शकते का? त्यावर तल्हाने उत्तर दिले की, पाकिस्तान सरकार कुठल्याही किंमतीत हे पाऊल उचलू शकत नाही. हाफीज सईदवर भारताने लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत हे पाकिस्तानी एजन्सी आणि सरकारला चांगले माहिती आहे. भारत कायम हाफीज सईदविरोधात अजेंडा चालवत आहे. पाकिस्तानचं सरकार कधीही सईदला भारताला सोपवण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही असं त्याने ठामपणे सांगितले.
तसेच हाफीज सईदची प्रकृती आणि जेलमधील अनेक गोष्टींवर विविध चर्चा होत आहे. हाफीद सईद जेलमध्ये आहे की घरी आहे असा सवाल विचारला गेला. त्यावर हाफीज सईद पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. सध्या ते कुरानची व्याख्या लिहित आहेत. इबादतमध्ये ते त्याचा जास्त वेळ घालवतात. ते पूर्ण दिवस बिझी असतात आणि त्यांचे वेळापत्रक ठरलेले आहे असंही तल्हा सईदने मुलाखतीत स्पष्ट केले.
दरम्यान, तल्हाच्या या मुलाखतीमुळे हाफीज सईद पाकिस्तानी सरकारच्या संरक्षणात असल्याचे स्पष्ट झाले. त्याला पाकिस्तानी एजन्सीने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. त्यातून दहशतवादी आणि दहशतवादाला खतपाणी घालत नसल्याचा पाकिस्तानचा दावा जगासमोर पुन्हा एकदा उघड पडला आहे. पाकिस्तानी सरकार दहशतवादाला आळा घालत असल्याचं तिथले नेते सांगतात त्यांची पोलखोल करणारी ही मुलाखत सध्या व्हायरल होत आहे.मागील काही काळापासून तल्हा सईद सातत्याने पाकिस्तानच्या मीडियात आणि सार्वजनिक कार्यक्रमात दिसून येत आहे. हाफीद सईदच्या ढासळत्या प्रकृतीमुळे तल्हाने त्याची जागा घेतल्याचे बोलले जाते.