हिंगोली, 4 एप्रिल (हिं.स.)।हिंगोली मध्ये शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.तर ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.या अपघातात २ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.८ जण विहिरीमध्ये बुडाले असून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. मागील तीन तासांपासून विहिरीत पडलेल्या महिला पुरुषांना बाहेर काढण्याचे प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांकडून सुरू आहेत. हिंगोलीसह नांदेड पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.