अमरावती, 8 मे (हिं.स.) दिवाळीपासून भाववाढीची अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता; मात्र अनेक दिवसांपासून साठवलेल्या कापसावर आता बारीक किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
दरम्यान, खरीप हंगामासाठी बी-बियाणे आणि रासायनिक खते खरेदीसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांना आता मिळेल त्या दरात कापूसविकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
आगामी खरीप हंगामासाठी मशागत व पेरणीची तयारी सुरू असताना, कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. सध्या कापसाला केवळ ७,६०० रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळत असून, अपेक्षित भाववाढ न झाल्याने शेतकऱ्यांना तोट्यात कापूस विकण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाववाढीची अपेक्षा फोल ठरली असून, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
खर्च जास्त, नफा कमी !
कापसाचे उत्पादन घेण्यासाठी खर्चात वाढ झालेली आहे. कापूस वेचणीसाठी १० रुपये किलो दर मजुराला द्यावे लागतात. फवारणी व इतर खर्च वाढला. तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. कापसाला ७,६०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे.इतर पिकांच्या तुलनेत कापसाला अधिक चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; परंतु शेवटी त्यांच्या पदरी घोर निराशाच आली आहे.