ठाणे, 8 जुलै (हिं.स.)। “मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” अशा ठाम शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मिरा रोड येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सरनाईक स्वतः सहभागी झाले.
या मोर्चात मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी होणार असल्याची कल्पना असूनही, मराठी माणसासाठी अपमान सहन करूनही सरनाईक मोर्चात सहभागी झाले. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना अटक झाल्यानंतर त्यांनी स्वतः काशिगाव पोलीस ठाण्यात जाऊन देशमुख यांची सुटका केली, तसेच नवघर पोलीस ठाण्यात जाऊन इतर कार्यकर्त्यांचीही सुटका केली. त्यानंतरच सरनाईक मोर्चात सहभागी झाले.
या पार्श्वभूमीवर, काल रात्री उशिरा पोलिसांनी काही मनसे नेत्यांवर केलेल्या कारवाईवरून सरनाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही सरनाईकांनी स्पष्ट केलं.
मोर्चानंतर माध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, “जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल, तेव्हा मी पद विसरून त्याच्या पाठीशी उभा राहीन. मी कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर मराठी अस्मितेसाठी इथे आलो आहे. माझ्यावर घोषणा करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला, पण मी माझी जबाबदारी पार पाडली. मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि शांततेसाठी ही माझी नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “मी मराठी एकीकरण समितीला वचन दिलं होतं आणि ते मी पाळलं आहे. जिथे कुठे मराठी माणसाचा प्रश्न असेल, तिथे मी मराठी माणूस म्हणून त्याच्यासोबत असेन. मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी.”या ठाम भूमिकेमुळे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी अस्मितेच्या संघर्षात आपली स्पष्ट बाजू मांडली असून, मिरा-भाईंदरमधील मराठी जनतेच्या भावना आणि हक्क यांना ठामपणे पाठिंबा दिला आहे.
