अमरावती, 9 एप्रिल (हिं.स.)
जूनपासून खरीप हंगाम सुरू होत असला तरी त्यापूर्वीच शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीचा झटका शासनाने दिला आहे. डीएपीमध्ये १५० रुपयांची वाढ प्रस्तावित असताना १०:२६:२६ खताचे दर २५५ ते २७५ रुपयांपर्यंत वाढविण्यात आलेले आहे. बीटी बियाण्यांची ३७ रुपयांनी दरवाढ झालेली आहे, आता कीटकनाशकांचेही दर ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची चर्चा होत आहे.
दरवर्षी शेतीपिकांचा उत्पादनखर्च वाढत असताना त्यातुलनेत उत्पन्नं होत नसल्याने शेतीचे समीकरणच बिघडले आहे. यंदा खरिपापूर्वीच रासायनिक खतांच्या दरवाढीला सुरुवात झालेली आहे. खतांची रॅक लागल्यावर यावेळेस खतांचा भाव काय राहील, हे निश्चित होत आहे. यावर्षी डीएपीची (डाय अमोनियम फॉस्फेट) दरवाढ होणार असल्याची चर्चा होत आहे. सध्या डीएपीचे दर १३५० रुपये प्रतिबॅग आहेत. यामध्ये १५० रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता आहे. या खतावरील अनुदान बंद करून दर वाढविण्याचा घाट रचला जात आहे. महिनाभरापासून १०:२६:२६ या खताचे दर १४७० रुपयांवरून १७२५ ते १७५० रुपयांवर पोहोचले आहे. कपाशी सोयाबीनसह बगिच्यासाठी या खताचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातच आता खतांचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
कीटकनाशकांचीही दरवाढ
केंद्रशासनाने बीटी बियाण्यांची प्रतिबॅग ३७ रुपयांनी वाढ केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात साडेपाच कोटींनी वाढ झाली आहे. शिवाय कीटकनाशकांच्याही दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
खतासोबत लिंकिंग
रासायनिक खतांसोबत कंपन्यांद्वारे दुय्यम खतांची लिंकिंगचा प्रकार वर्षभरापासून सुरूच आहे. याबाबत विक्रेत्यांद्वारा तक्रार होत नसल्याने कृषी विभागाद्वारा कारवाई करण्यात येत नाही. परंतु हे दुय्यम दर्जाचे खत विक्रेत्यांद्वारा शेवटी शेतकऱ्यांनाच विकण्यात येते.