लंडन, 19 जून (हिं.स.) :
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम
इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. भारत
आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांपेकी पहिला कसोटी सामना हा लीड्समध्ये
खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्र अश्विन यांच्या
निवृत्तीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच मोठा दौऱा आहे.
युवा कर्णधार शुममन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या
टीम इंडियाला २००७ नंतर इंग्लंडमध्ये
कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे १८ वर्षानंतर हा इतिहास गिलचा संघ
बदलण्यात यशस्वी ठरणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.
इंग्लंडमधील खेळपट्ट्या या कायमच वेगवान
गोलंदाजांसाठी नंदनवन ठरतात. त्यामुळे भारतीय फलंदाजांसाठी ही कसोटी मालिका एक अग्निपरीक्षाच
ठरणार आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल ऑस्ट्रेलियात यशस्वी ठरला होता. त्यामुळे
त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. भारतीय संघाची फलंदाजीची भिस्त यशस्वी
जयस्वाल, के.एल. राहुल, शुभमन गिल, ऋषभ पंत आणि संधी मिळाल्यास साई सुरदर्शनवर
असणार आहे. तर करुण नायर दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय गोटात चिंतेचें वातावरण
आहे.
भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा ही जसप्रीत
बुमराहवर असणार आहे. आता त्याच्या साथीला संघात मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा हे
गोलंदाज असतीलच. शिवाय संघात फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाबरोबरच कुलदिप यदवला संधी
मिळणार का हा सवालही उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे शार्दुल ठाकूर आणि नितीश
कुमार रेड्डी या दोघांपैकी अंतिम अकरामध्ये कुणाला सधी द्यावी हा यक्ष प्रश्न
कर्णधार शुभमन गिलसमोर निर्माण झाला आहे. आता टीम इंडिया या कसोटी मालिकेची
सुरुवात विजयी सलामी देत करणार का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.