बीजींग, 7 मे (हिं.स.)।पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूरद्वारे’ पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणावर मध्यरात्री हवाई हल्ले केले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने केलेली कारवाई दुदैवी असल्याचं चीनने म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो, असं चीनने म्हटलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे हे विधान पुढे आले आहे.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ही कारवाई २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली. पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.संरक्षण मंत्रालयाने निवेदनात पुढे म्हटले आहे की, “काही वेळापूर्वीच, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. ज्या ठिकाणांवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला आणि ते निर्देशित करण्यात आले होते.” “आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेले नाही. भारताने लक्ष्यांची निवड आणि प्रत्यक्ष कारवाई करताना भारताने बराच संयम दाखवला आहे,”असेही त्यात नमूद केले आहे.