नवी दिल्ली , 27 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी आज(दि.२७) शेवटचा दिवस आहे.त्यामुळे आज(दि.२७) पासून पाकिस्तानी नारिकांचे आपत्कालीन व्हिसा रद्द होणार आहेत.याच दरम्यान, गुप्तचर विभागाने (IB) दिल्लीत राहणाऱ्या सुमारे ५ हजार पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने गुप्तचर विभागाला (IB) दिल्लीत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची यादी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुप्तचर विभागाने (IB) दिल्लीत राहणाऱ्या सुमारे ५००० पाकिस्तानी नागरिकांची यादी शहर पोलिसांना दिली आहे. फॉरेन रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) ने ही यादी पोलिसांच्या विशेष शाखेकडे पाठवल्यानंतर पडताळणीसाठी ती जिल्हा युनिट्सकडे पाठवली आहे. यादीतील अनेक पाकिस्तानी नागरीकांचे व्हिसे रद्द करण्यात आले आहेत.
दीर्घकालीन व्हिसा (LTV) असलेल्या विशेषतः हिंदू पाकिस्तानी नागरिकांना सूट देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, २७ एप्रिलपासून वैद्यकीय, राजनैतिक आणि दीर्घकालीन व्हिसा वगळता उर्वरित व्हिसे रद्द केले जातील. त्यामुळे दिल्लीत हालचालींना वेग आाला असून अधिकारी ३,००० आणि २००० नावांच्या दोन वेगवेगळ्या यादींमध्ये नावे जुळत आहेत का, याची पडताळणी करत आहेत.