चंदीगड, 30 मे (हिं.स.)। आयपीएल 2025 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या पराभवामुळे पंजाबचे आयपीएल स्वप्न संपुष्टात आलेले नाही.पंजाबकडे अजूनही अंतिम फेरीत पोहोचण्याची एक महत्त्वाची संधी आहे.
या सामन्यात पंजाबचा संपूर्ण संघ केवळ 101 धावांवर बाद झाला. आरसीबीने 8 विकेट्स राखून सहज विजय मिळवत अंतिम फेरीत मजल मारली. सुयश शर्मा आणि जॉश हेजलवूड यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडाली. परंतु, संघासाठी ही शेवटची संधी नव्हे. पंजाब किंग्ज आता क्वालिफायर-2 मध्ये खेळणार आहे, जिथे त्यांचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा सामना 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 3 जून रोजी अंतिम फेरीत आरसीबीशी भिडणार आहे.
सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, ‘आपण लढाई हरलो आहोत, युद्ध नाही. संघ अजूनही एकत्र आहे आणि आम्ही अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’ पंजाब किंग्जच्या चाहत्यांसाठी ही आशेची किरण आहे. एक विजय आणि संघ आयपीएल 2025 च्या विजेतेपदाच्या शर्यतीत पुन्हा येईल.