जेरुसलेम, 7 मे (हिं.स.)।भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणांवर थेट हवाई हल्ले करत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली. भारताच्या या एअर स्ट्राइकनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेनंतर आता इस्रायलकडून ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करण्यात आले आहे. या एअर स्ट्राइकचे इस्रायलकडून समर्थन करण्यात आले आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी एक्सवर पोस्ट करत भारताला खुले समर्थन दिले आहे.
इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे, असे अझर यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि दक्षिण आशियातील तज्ज्ञ मायकेल कुगेलमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भारताने पाकिस्तानवर अधिक जोरदार हल्ला चढवला. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील परिस्थिती २०१९ पेक्षाही खराब होऊ शकते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. त्या ठिकाणांहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले गेले आणि निर्देशित केले गेले. भारतीय सशस्त्र दलांनी एकूण ९ ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. आमच्या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही. भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली, त्याच्या पद्धतीत भारताने बराच संयम दाखवला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सामील असलेल्यांना जबाबदार धरले जाईल, या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.