* आरोग्य विद्यापीठाच्या समर इंटर्नशिप प्रोगाममधील ‘फ्लॅग ऑफ सेरोमनी’ समारंभ संपन्न
नाशिक, 30 मे (हिं.स.) – विविध विषयात संशोधन होण्यासाठी विद्यर्थ्यांमध्ये कुतुहल जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील समर इंटर्नशिप प्रोग्राममधील ‘फ्लॅग ऑफ सेरोमनी’ कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, उपकुलसचिव श्री. एन.व्ही. कळसकर उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे संचालिका डॉ. शर्मिला बापट ऑनलाईन उपस्थित होत्या.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण विकसित करणे व संशोधनाकरीता व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाचा हा अनोखा उपक्रम आहे. विद्याथ्यांमध्ये संशोधनाची जाणीव जागृत होणे आवश्यक आहे. समस्या नेमकी काय आहे हे माहित करुन त्या दिशेने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांच्या नोंदी ठेऊन त्यावर समाजोपयोगी संशोधन होणे अपेक्षित आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक, व्यावाहारिक व कौशल्यवृद्धीसाठी विकसित केले जातात.
त्या पुढे म्हणाल्या की, समर इंटरनशीप प्रोग्राम हा केवळ शिक्षणाचा भाग नसून ती एक संधी आहे ज्यामध्ये विद्यार्थी आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि उद्योग क्षेत्राशी परिचित होतात. यामुळे त्यांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा निश्चित करता येतात. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा एकसंघ गट निर्माण करुन त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे ती माहिती संशोधनाकरीता उपयुक्त ठरेल असे वाटते. समाजात होणारे संशोधनाला ‘नोबेल’ पारितोषिक मिळेल असे संशोधन होणे गरजेचे असून त्यासाठी पायाभूत बाबी आवश्यक असणे आवश्यक आहेत. या दृष्टीने विद्यापीठाकडून विविध संशोधन उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. यासाठी विद्यापीठाने ‘डिजिटल हेल्थ फाऊंडेशन’ उपक्रम सुरु केला असून तो संशोधनात मैलाचा दगड ठरेल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या संचालिका डॉ. शर्मिला बापट यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर अन्य क्षेत्रातील अनुभवाकरीता विद्यापीठाचा उपक्रम प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधी शोधतांना संशोधनाची कास धरावी ज्याने देशाचा नावलौकिक वाढेल. विद्यापीठाच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये इंटर्नशिप करीता आलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी उपलब्ध झाल्या आहेत. उपयोजित ज्ञान व कौशल्य यांचा मेळ घालून काम करणे गरजेचे आहे. क्लिनीकल रिसर्चमध्ये मोठया प्रमाणात संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचे कुतुहल जागे करुन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे शंभर पेक्षा अधिक समर इंटर्नशिप प्रोगाम झाले असून त्यात एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमाच्या माध्यतातून अन्य क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांना येतात त्याचा उपयोग भविष्यात कामी येईल. यामुळे नवीन मित्र जोडले जातात तसेच अन्य स्थानावर जाऊन कौशल्य आत्मसाद करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. इनोव्हेशनकरीता आवश्यक बाबींचा उहापोह समर इंटर्नशिप प्रोगामच्या माध्यमातून होत असतो. संशोधनाकरीता आवश्यक प्रणाली निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभागी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काळातला वेळ समर इंटर्नशिप प्रोगाममध्ये येऊन कौशल्य ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहे. डिजिटल तंत्रान आणि सॉफ्टवेअरच्या युगात विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणासाठी कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून सुरु असलेला उपक्रम आदर्श आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची योग्य दिशा मिळेल त्यांच्या क्षमतांची वृद्धी होईल. विद्यापीठ शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षणावरही भर देत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील नेतृत्वासाठी नवीन संशोधक पिढी निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.