सोलापूर : करमाळा तालुक्यात बिबट्याने तीन बळी घेतले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या बिबट्याची धास्ती संपूर्ण तालुक्याने घेतली आहे. मात्र कुणीही घाबरू नये, वेळप्रसंगी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग केला जाईल. येत्या दोन दिवसांत या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.
अंजनडोह (ता. करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जयश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी आज (शुक्रवारी) सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंजनडोह येथे आयोजित अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी मृत जयश्री शिंदे यांचे पती दयानंद शिंदे व त्यांच्या तीन मुलांशी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे यांनी संवाद साधला. आमदार संजय शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, वनविभागाचे धनंजय पाटील उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले, करमाळा तालुक्यात एकापेक्षा जास्त बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र कुणीही घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येकच बिबट्या मनुष्यावर हल्ला करतो असे नाही. माणसावर हल्ला करणारा एकच बिबट्या आहे, या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग, पोलिस विभाग, महसूल आदी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. शासन स्तरावरही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या बिबट्या वांगी भागात आहे. या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी, शार्प शूटर, ड्रोन पथक तैनात आहेत. दोन दिवसांत या बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, असे अश्वस्त केले.