अमरावती, 13 मे (हिं.स.) उन्हाळा हा पर्यटनासाठी पीक पिरेड मानला जातो. यातूनच दिवाळीपासून त्याचे बुकिंग सूरू होते. याशिवाय यात्रेला जाण्यासाठी शेकडो भाविकांनी बुकिंग करतात, मात्र भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीने अनेकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. याचा फटका या व्यवसायांसह यात्रेकरूंना बसला आहे. यात्रेकरूंचे पैसे बुकिंगमध्ये अडकले आहेत. त्यांना ते पैसे परत मिळण्यासाठी विलंब लागणार आहे.
उन्हाळ्यात काश्मीर, अमृतसर, लेहलद्दाख, केदारनाथ धामसाठी जाणाऱ्या भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. उन्हाळ्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडे असतात. तीर्थयात्रेसह पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. केदारनाथ या ठिकाणी चढाईसाठी घोडे, खेचर डोली आणि आता हेलिकॉप्टरची व्यवस्था आहे.
हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे थांबले
काही टूर चालकांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून धार्मिक स्थळापर्यंत पोहचण्याची सुविधा दिली होती. टूर रद्द झाल्याने त्यांचे बुकिंग रद्द झाले आहे. यामुळे त्यांना हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे मिळण्यास वेळ लागणार आहे.
काश्मीरचे प्रवास थांबले :
टूर अँड ट्रॅव्हल्सने काश्मीरकडे जाणारे प्रवास थांबविले आहे. काश्मीर, अमृतसर, लेहलद्दाख यांसह या भागातील विविध ठिकाणी जाणारे प्रवास रद्द केले आहेत.
याबाबत सहल संचालक महेश तिवारी म्हणाले की, “चारधाम यात्रेला कुठलाही धोका नाही. मात्र, संपूर्ण परिस्थिती पाहता प्रवासी निर्णय घेतात. मात्र काश्मीर, अमृतसर या भागातील पर्यटनाचे टूर रद्द केले आहे. ते पुढे परिस्थिती निवळल्यावर होतील.”
—————