मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत बोलताना ही माहिती दिली. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी याची माहिती दिली. Letter threatening to kill Raj Thackeray, Bala Nandgaonkar responds to Pune rally
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याची माहिती दिली. तसेच भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने या धमक्या मिळत असून या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला आहे. शिवाय राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे त्यांनी यावेळी म्हटलं.
गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बाळा नांदगावकर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना म्हणाले, ”भोंग्यांचा विषय हाती घेतल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या येत आहे. पत्रात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरे यांना पत्र दाखवले. त्यानंतर १० मे या दिवशी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पत्राची प्रत दिली. पोलीस काय कारवाई करतात, ते पाहू, असे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटेल. या पत्रात ‘अजानविषयी जे करत आहात, ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करू. तुम्हाला तर सोडणार नाहीच; पण राज ठाकरे यांनाही मारून टाकू’, अशी धमकी देण्यात आली आहे. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी संरक्षण मागत आहे. राज्य सरकार याची नोंद घेत नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नव्हे, तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, तर देशातील लोकांना याचा त्रास होत आहे. हे सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे.
या संदर्भातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल आम्हाला माहिती नाही. परंतु राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य , केंद्र सरकारनेही घ्यावी आणि त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते चांगले गृहमंत्री आहे, ते नक्कीच कारवाई करतील.
□ 15 मे रोजी पुण्यात मेळावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे, ठाणे, मुंबईमध्ये सभा घेतली होती. आता पुन्हा पुण्यात मनसेचा जाहीर मेळावा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे मनसेमध्ये खांदेपालट केल्यानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसेची पुढील रणनिती ठरण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. या मेळाव्याला मनसे नेते बाळा नांदगावकरसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकांसाठी तयारी केली आहे. तसेच मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात आता जाहीर मेळावा होणार आहे. १५ मे रोजी रविवारी हा मेळावा होणार आहे. मनसेमध्ये सुरु असलेल्या वादात आता पक्षातून कोणती भूमिका घेण्यात येईल याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता मनसैनिकांप्रमाणे महाराष्ट्राला लागली आहे.