नाशिक , 12 मे (हिं.स.)।
– निवडणुकीबद्दल काही सांगता येणार नाही, परंतु आम्ही महायुतीतच लढणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले. एका खासगी कार्यक्रमासाठी रविवारी रात्री उशिरा नाशिक येथे आले असता, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढे पण जाऊ शकतात अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
युद्धविरामावर भाष्य करत सांगितले की, काल सिजफायर जाहीर झाला असला तरी अजूनही अधूनमधून गोळीबार सुरूच आहे. पंतप्रधानांनी योग्य उत्तर दिले आहे आणि जर पाकिस्तानची स्थिती अशीच राहिली तर त्यांना कडक इशारा दिला जाईल.
तसेच राऊत व आव्हाडांच्या टीकेवर भाष्य करताना महाजन म्हणाले, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना दुसरी काही कामे आहेत का? आपल्या सेनेने त्यांना धडा शिकवला आहे. युद्धविराम जाहीर झाला तरी त्यांना काही काम उरलेले नाही, अशी टीका महाजन यांनी केली. काँग्रेसच्या दहशतवादावरील टीकेवर उत्तर देताना म्हणाले, जर काँग्रेसला दहशतवाद वाटत असेल तर आम्ही काही सांगू शकत नाही. आजच्या काळात परिस्थिती बदलली आहे आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या स्थितीवर भाष्य करत सांगितले, पाकिस्तानची आजची परिस्थिती काय आहे? त्यांच्याकडे खायला नाही, परंतु आपला देश वेगाने प्रगती करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नथुराम गोडसे यांच्याबद्दलचे उद्गार त्यांचे वैयक्तिक मत असून, त्यावर काही बोलण्यास महाजन यांनी नकार दिला.
महंतांची लवकरच मुंबईत बैठक
कुंभमेळा तारखा जाहीर झाल्या नसल्याने त्याबाबत साधू-महंतांची मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करण्यात आली असून, त्याच बैठकीत नाशिक कुंभाच्या तारखा जाहीर केल्या जातील, असेही महाजन म्हणाले. कुंभमेळा प्राधिकरणाची घोषणा झाली आहे. त्याच्या कामांनाही वेग येलो आहे. त्यामुळे कोणाचीही नाराजी नसून, कामांमध्ये दुर्लक्ष होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.