मालेगाव, 14 मे (हिं.स.)।
– भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना मालेगावमधून एका तरुणाने संशयास्पद गुगल सर्चिग केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाला एटीएसने ताब्यात घेतले असून त्याची सहा तास कसून चौकशी करण्यात आली.पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. भारताच्या या निर्णायक कारवायांमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्येतणाव वाढला आणि युद्ध पेटण्याच्या सीमारेषेवर स्थिती पोहोचली. या तीव्र संघर्षाच्या तीन दिवसांनंतर अखेर शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
मात्र, या काळात मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट अॅक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एका ४५ वर्षीय यंत्रमाग मालक तरुणाला पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची सुमारे सहा तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
सकाळपासूनच एटीएस पथकातील एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन कर्मचारी मालेगाव शहरात गुप्तपणे कार्यरत होते.
सायबर सेलकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुरुवार वॉर्ड परिसरातील घरावर छापा टाकून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद वेबसाईट सर्च केल्याचे निष्पन्न झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. यामध्ये काही वेबसाईट्स पाकिस्तानमधील असल्याचा संशय असून संबंधित व्यक्तीचे पाकिस्तानमधील कोणत्या व्यक्तींसोबत संपर्क आहेत का? याबाबत चौकशी केली जात आहे.