अमरावती, 17 मार्च (हिं.स.)
एमआयडीसी येथील रामा इंडस्ट्रीजला अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून पूर्ण इंडस्टीजमध्ये आग पसरली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग विझविण्याकरिता अमरावतीसह एमआयडीसी, चांदूर रेल्वे आणि तिवसा येथील अग्निशमन बोलाविण्यात आल्या. आग विझविण्याकरिता एकूण २५ बंब लागले.
हनुमान अग्रवाल यांची एमआयडीसी येथे संजय ऑईल मील आणि रामा इंडस्ट्रीज नावाने कंपनी आहे. कंपनीमध्ये ढेप, सरकी, ऑईल आणि मोठ्या प्रमाणात बारदाना आहे. रविवारी संध्याकाळी कंपनी बंद असताना अचानक रामा इंडस्ट्रीजमधून धूर निघताना दिसताच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, आगीचा लोंढा बाहेर आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मालकासह अग्निशमन विभागाला माहिती दिली. परंतु इंडस्ट्रीजमध्ये बारदाना, ढेप, सरकी आणि ऑईल असल्यामुळे आग क्षणातच चारही बाजूने पसरली. अग्निशमनच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या मात्र आगीने तोपर्यत रौद्ररूप धारण केले होते.
आग आजुबाजुच्या कंपनीपर्यंत पोहचू नये त्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा केला. परंतु आग आटोक्यात येत नव्हती. एका पाठोपाट २० पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले तरीसुध्दा आग पसरत होती. हे पाहताच अग्निशमन विभागाने एमआयडीसी, चांदुर रेल्वे आणि तिवसा येथील बंब बोलाविले. चारही बाजूने सतत पाण्याचा मारा असल्यामुळे आग आटोक्यात आली. परंतु आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.