16 वर्षांनंतर असा विक्रम
मुंबई, 24 मे (हिं.स.) – पुढील दोन दिवसांत बहुप्रतिक्षित मोसमी पाऊस भारताच्या वेशीवर दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार २५ मे पर्यंत मोसमी पाऊस केरळात, तर मुंबईत साधारणत: १ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. या सुखद समाचाराने गरमीने हैराण झालेले लोक आता पावसाची चातकासारखी आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, पुढील २-३ दिवसांत केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते, यापूर्वी, हवामान खात्याने आपल्या मागील अंदाजात २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. परंतू आता त्याही आधीच तो दाखल होत आहे. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती अनुकूल आहे आणि मान्सून वेळापत्रकानुसार पुढे सरकत आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर, आम्ही भाकित केल्याप्रमाणे, तो २५ मे पर्यंत केरळच्या किनाऱ्यावर पोहोचू शकतो.
दरम्यान, दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते सध्या स्थिर आहे. परिणामी महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
यापूर्वी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून लवकर आला होता. २३ मे च्या आसपास मान्सून केरळात पोहोचण्याची ही दोन वर्षे सोडली तर इतर वेळी मान्सून उशिरानेच आला होता. अनेकदा तर अल निनोसारख्या प्रभावामुळे मान्सून केरळच्या वेशीवरच रेंगाळला होता. यामुळे पुढेही तो जून संपला तरी पोहोचू शकलेला नव्हता. केरळमध्ये सरासरी मान्सून दाखल होण्याची तारीख १ जून आहे. परंतू, १९१८ मध्ये सर्वांत आधी म्हणजेच ११ मे रोजी दाखल झाला होता. तर सर्वांत उशिरा १९७२ मध्ये दाखल झाला होता. २०१६ मध्ये मान्सून ९ जूनला दाखल झाला होता.
केरळ व्यतिरिक्त दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे सरकरणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तसेच सध्या दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आता येत्या ३६ तासांत हा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडून काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दुसरीकडे गेल्या १७ दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने नाशकात आता काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सात मे पासून पाऊस सुरु झाला होता. रोज दुपारी नाही तर रात्री तो बरसत होता. वीज पडून काही जणांचा मृत्यू झाला. झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले होते.
अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीसमोर तयार झालेल्या हवेच्या कमी दाब क्षेत्रातून, आवर्ती चक्रीय वाऱ्यांची निर्मिती व त्याचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणातून पावसाचा जोर वाढला होता. ३१ मे पर्यंत पावसाचे वातावरण असले तरी २९ मे पासून महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण काहीसे निवळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा. परंतु कपाशी व टोमॅटो लागवड करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी कळविले आहे.
