मुंबई, 23 जून (हिं.स.)।लोकलमध्ये सुरक्षितता वाढविण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम सुरू केले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या २५ लोकलमध्ये ५० सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्या आहेत.मुंब्रा अपघातानंतर हे काम रेल्वेने फास्ट ट्रॅकवर आणले आहे.
मुंबईतील आणखी १५ लोकलसाठी ३० यंत्रणा ऑर्डर करण्यात आल्या आहेत. एका लोकलमधील दोन मोटरमन केबिनसाठी अंदाजे १.२४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या २६ लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या मोटरमनचा या यंत्रणेला विरोध होता. परंतु, आता हे काम रेल्वेने फास्ट ट्रॅकवर आणले आहे.अपघात झाल्यास मोटरमनची कृती, त्याचा प्रतिसाद हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमधून तपासले जाऊ शकते. मोटरमनवर असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीची नोंद ठेवता येते. त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य धोरण ठरवता येणार आहे. यासाठी लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई लोकलने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांचे ट्रेनमधून पडून किंवा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू होतात. अनेकदा अपघातांचे कारण स्पष्ट होत नसल्याने रेल्वे प्रशासनाला याची कारणे शोधता येत नाहीत. तसेच प्रवाशांना नुकसान भरपाई देताना रेल्वेला त्यांची बाजू कोर्टामध्ये स्पष्टपणे मांडता येत नाही.आता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत मिळू शकेल. यामध्ये अपघातादरम्यान बाह्य बाबींचा समावेश आहे का ? प्रवाशांची चूक आहे का ? अपघातावेळी मोटरमनचे लक्ष कुठे होते ? त्याने सर्व सूचनांचे पालन करतानाच सर्व सिग्नल पाळले आहेत का ? अशा अनेक बाबी तपासणे शक्य होईल.