पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दिले सडेतोड प्रत्युत्तर
नवी दिल्ली, 07 मे (हिं.स.) : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर 1.44 वाजता हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तय्यबा या जिहादी दहशतवादी संघटनांची मुख्यालये देखील नष्ट करण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बहावलपुर, मुरीदके, गुलपुर, भीमबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट, मुजफ्फराबाद याठिकाणी जोरदार हवाई हल्ले चढवले. रात्री 1.44 वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 हिंदूंचे टार्गेट किलींग करण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रात्रभर ऑपरेशन ‘सिंदूर’वर सतत लक्ष ठेवून होते. या कारवाई अंतर्गत एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि सर्व हल्ले पूर्णपणे यशस्वी झाले.
दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर देशाच्या अनेक भागांमध्ये विमान उड्डाणं रद्द करण्यात आली किंवा उशिराने उड्डाणं झाली. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने 7 मे रोजी दुपारपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत.—